मोटरसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाऱ्या गुन्हेगारास राहुरी पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी आकाश आहेर (रा. बारागाव नांदूर) यास पोलिसांनी अटक केली. आहेर हा मोटरसायकल परत करण्यासाठी हस्तकामार्फत पैशाची मागणी करत असे.
राहुरी तालुक्यात मोटरसायकल चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. मोटरसायकल चोरी करून पुन्हा मालकांशी संपर्क साधत मोटरसायकल परत करण्यासाठी पैशाची मागणी करणारी टोळी कार्यरत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके. पोहेकॉ. संजय पठारे, पोलिस नाईक अमित राठोड, पोलिस नाईक शिवाजी खरात, पोलिस नाईक निलेश मेटकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन ताजणे आदींचे पथक तयार करून सापळा लावण्यात आला. त्यानुसार आकाश आहेर (रा . बारागाव नांदूर) यास बारागाव नांदूर शिवारातून पकडण्यात आले. चौकशीअंती त्याने त्याचे साथीदार गणेश शेटे, तसेच सनी बाचकर अशी नावे सांगितली. तालुक्यातून १३ मोटारसायकली चोरल्याची कबुली त्याने दिली असून त्यापैकी एकूण ०९ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. त्यापैकी चार मोटारसायकल त्यांनी मुळा धरणात खोलवर पाण्यात टाकल्याची कबुली दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ . दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सपोनि बागुल करत आहेत.